संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडीपर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी जांबुतचे उपसरपंच १ मार्चपासून आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरीही शासन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठच्या टंचाईग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांची साकूर येथे नुकतीच बैठक पार पडली.
सदर बैठकीत या मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर गुरूवार दि. ७ मार्च रोजी एकोणीस मैलावरील नाशिक – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचे निवेदनही प्रशासनाला दिले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन खडबडून जागे झाले असून बुधवार दि. ६ मार्च रोजी दुपारी १.३० वा. मा. उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग संगमनेर यांचे अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात बैठक आयोजीत केली आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
