मागच्या दोन दिवसापासून देशात पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसाने लोकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसानं महापुराची स्थिती निर्माण झाली.
त्यामुळे घरात पाणी आलं, महापुराची समस्या निर्माण झाली. पुढचे काही दिवस अति मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट आहे.
मुंबईसह राज्यात आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळाचा प्रभाव पुन्हा एकदा दिसणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. एकीकडे john cyclone मुळे मोठं नुकसान झालं आहे. मेक्सिकोमध्ये या चक्रीवादळाने नुकसान होत आहे. तर त्याच वेळी उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याचा परिणाम भारतावर आणि आसपासच्या देशांवरही देसून येणार आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 30-40 किमी असेल, तर कमाल वेग 55 किमी प्रति तासापेक्षा जास्त असू शकतो.
आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “चक्रीवादळ वाऱ्याचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडेल. “आम्ही कोकण गोवा, गुजरात प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट दिला आहे. येत्या 48 तासात समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, बिहार आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सिक्कीम, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ईशान्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, उत्तर हरियाणा, पूर्व राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, दिल्ली, पश्चिम गुजरात, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
