कोणतीही निवडणूक म्हटले ही मतमोजणीवर आक्षेप हा ठरलेलाच. त्यातही ग्रामपंचायती निवडणुकीत जय-पराजयात एक-दोन मतांचा फरक असेल तर पराभूत उमेदवारांसाठी ही जिव्हारी लागणारा निकाल असतो.
असा प्रकार 2021 मध्ये प्रतिभा देवी यांच्याबाबत घडला होता. केवळ 2 मतांनी त्या पराभूत झाल्या. पण हार न मानता त्या कोर्टात गेल्या अन् तब्बल चार वर्षांनी पुन्हा मतमोजणी झाली अन् त्या 2 मतांनी विजयी झाल्या.
कोर्टाच्या निकालाने चार वर्षांनंतर प्रतिभा देवी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. उत्तर प्रदेशातील रूनी चुरसाई ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला होता. सरपंचपदासाठी 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रतिभा देवी यांना 480 तर त्यांच्या विरोधातील उमेदवाराला 482 मते मिळाली होती. केवळ दोन मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
प्रतिभा देवी यांना हा पराभव मान्य नव्हता. काही मते मोजलीच गेली नाही, असा दावा करत त्यांनी हार न मानता स्थानिक कोर्टात धाव घेतली. सतत चार वर्षे त्यांनी कोर्टात हा मुद्दा उचलून धरला अन् कोर्टान पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. या मतमोजणीमध्ये प्रतिभा देवी यांना 484 तर आधी विजयी झालेल्या उमेदवाराला पूर्वीप्रमाणेच 482 मते मिळाली. चार बूथवर प्रत्येक एक याप्रमाणे चार वाढीव मते प्रतिभा देवी यांना मिळाली.
पुन्हा झालेल्या मतमोजणीत प्रतिभा देवी दोन मतांनी विजयी झाली. पण हा विजय त्यांच्यासाठी खास ठऱला. तब्बल चार वर्षे लढा दिल्यानंतर हा विजय मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. प्रतिभा देवी या दुसऱ्यांदा गावच्या सरपंच बनल्या आहेत. त्यांनी सांगितले की, 2021 मध्ये आपल्याला आधी विजयी घोषित करण्यात आले होते. पण काहीवेळाने विरोधी उमेदवाराला सरपंच म्हणून जाहीर करण्यात आले. आज प्रशासनाने न्याय दिला.
प्रतिभा देवी यांचे पती अशोक कुमार हेही गावचे दोनदा सरपंच होते. आता पत्नीही दुसऱ्यांदा सरपंच बनल्याने त्यांच्या घरात चौथ्यांदा सरपंचपद आले आहे. अशोक कुमार हे एका शाळेमध्ये सध्या मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. शिक्षक होण्याआधी ते सरपंच होते.
