संगमनेर (DSNews24/किरण पुरी) जून महिना संपत आला तरी मान्सूनने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांसहसर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. त्यानंतर आज पहाटेपासून मुंबईसह राज्यातील इतर भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अशातच आज संगमनेर तालुक्यातील साकूर सह परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला असून रखडलेल्या पेरण्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे…
पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. रोहिणी आणि मृग नक्षत्रांनी वाकुल्या दाखवल्याने आता पावसाचे काय होणार? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
मात्र, आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर आज दुपारनंतर पावसाने साकूर सह परिसरात हजेरी लावल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
मात्र, पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
