मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने (Rain) राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली आहे. राज्यात सध्या पाऊस मुसळधार नसला तरीही हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत.अशातच आता हवामान खात्याने (IMD) विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह विदर्भ मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज पुण्यासह (Pune) काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याने या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असेल. अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला आहे.
