पारनेर ब्रेकिंग! खा. निलेश लंकेंच्या मध्यस्थीने भूमिपुत्रांचे उपोषण सुटले

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहांजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे हे गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. तसेच प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मात्र शेवटी संतोष वाबळे या शेतकऱ्याने येत्या दोन दिवसांत उपोषणावर कुठलाही तोडगा न निघाल्यास तहसील कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर उपोषणाच्या आठव्या दिवशी डिंभे धरण विभागासह इतर विभागाचे अधिकाऱ्यांनी वरीष्ठांची तातडीने चर्चा करत उपोषणास्थळी धाव घेतली. तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने डिंबे धरण विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे एम के शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. 

कुकडी प्रकल्प समूहामध्ये डिंभे, पिंपळगाव जोगे, वडज, माणिकडोह व येडगाव या पाच धरणांचा समावेश आहे. या धरणांतर्गत विविध योजनांची पाणी मागणी आहे. तसेच डिंभे माणिकडोह बोगद्याच्या कामाचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत कुकडी प्रकल्पाच्या पाणी वापरच्या फेरजल नियोजनाची कार्यवाही WAPCOS, दिल्ली या संस्थेमार्फत सुरु आहे. सदर संस्थेचा अभ्यास अहवाल अद्याप अप्राप्त आहे. सदर अभ्यासाच्या अंतिम अहवालानंतर उपसा सिंचन योजनांना किती पाणी शिल्लक राहू शकते, त्यानंतरच याची माहिती उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीत आपण मागणी केलेल्या कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी, शहाजापूर या उपसा सिंचन योजनांचा WAPCOS, दिल्ली या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधान्याने विचार करण्यात येईल. तसेच डिंभे माणिकडोह बोगदयाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून बोगद्याच्या संकल्पना बाबत कार्यवाही सुरु आहे. सदरील कामाबाबत WAPCOS, दिल्ली या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कार्यवाही करण्यात येणार आहे असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा प्रवक्ते सुभाष पाटील करंजुले, तालुकाध्यक्ष मनोज तामखडे, अनिल सोबले वसंत शिंदे, वसंत साठे, बाळासाहेब वाळूंज, अंकुश पयमोडे, विशाल पायमोडे, अविनाश देशमुख, अब्बास मुजावर, एस एल ठूबे, अन्सार पटेल, रघुनाथ माडगे, राजू करंदीकर, नंदू साळवे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment