विधानसभा निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार १२०० मतांनी निवडून आले होते. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, याबाबत शाश्वती नव्हती. कर्जत जामखेडमध्ये पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम शिंदे यांनी कर्जत जामखेडच्या पराभवानंतर अजित पवारांवर (Ajit Pawar) थेट आरोप केले आहेत. राम शिंदे म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो आहे. हे आज दिसून आलंय. मी महायुतीचा धर्म पाहण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं ते बोलले म्हणजे हा सुनियोजित कट होता. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी आगोदरच सांगितलं. माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती मात्र दादा बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक वादादरम्यान काही करार झाले त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला.
शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र फेटाळला, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार आहे, हे काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे. प्रिज्युडिस माईंडनं आरओ काम करत होते. मद्य, पैसे आणि इतर गोष्टींचे वाटत झाले यासंदर्भात देखील तक्रार केलीये, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यात संभाषण झाले. अजित पवार रोहित पवारांना म्हटले की, रोहित थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, दर्शन घे काकांचं असा मिश्कील टोला अजित पवारांनी मारला होता. यावेळी रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडला आहे. अजित पवारांच्या याच विधानावरुन राम शिंदेंनी (Ram Shinde) गंभीर आरोप केले आहे. कर्जत जामखेडमध्ये कट रचला होता. त्याचा मी बळी ठरलो, असं त्यांनी म्हटलं आहे.
