कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच पुणे जिल्ह्यात असाच भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये 8 आणि 9 वर्षांच्या सख्खा बहिणींचा निर्घृण खून करण्यात आला.
बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने हे कृत्य केले असून हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवले आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अजय दास (वय – 54) नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी सुनिल मकवाने (वय – 9) आणि दुर्वा सुनिल मकवाने (वय – 8) अशी मृत मुलींची नावे आहेत. दोघी बुधवारी राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, चंद्रमा गार्डन भागातून दुपारी खेळताना बेपत्ता झाल्या होत्या. मुली बेपत्ता झाल्याचे कळताच घाबरलेल्या पालकांनी सायंकाळी खेड पोलिसात याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली.
संशय आल्याने पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरच्या रुमची झडती घेतली. यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या वेटरला एका लॉजमधून अटक केली. आरोपीने ही हत्या का केली? मुलींवर अत्याचार करण्यात आला होता का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
