संगमनेर(DSNews24) आमच्यात शिवरायांचं रक्त आहे. तुला जर त्रास होत असेल तर तू तुझी बॅग भर, तिकीट काढ अन परत जा. आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, अबू आझमी तुझी वारीवर बोलण्याची लायकी नाही अशा शब्दांत शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याने वारी संदर्भात केलेल्या विधानावर जोरदार टीका केली आहे.
आषाढीची वारी आणि नमाजाच्या गर्दीची तुलना करताना समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी यांनी वारीतील पालख्यांमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य केले. यावर चांगलच वादंग निर्माण झाला आहे. संगमनेरचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया म्हणाले की , “अबू आझमी नीट लक्षात ठेव, वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन वारा, पावसाची सर झेलत, पायी चालत असतात. ट्रॅफिक जॅम सोड ॲम्ब्युलन्स जरी आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात.
ही आमची परंपरा आहे अबू आझमी तुला त्रास होतोय तर मग तुझी बॅग भर, तिकीट काढ आणि परत जा..बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या तुमच्यासारख्या भैय्याना आमच्या ‘वारी’ वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आणि लक्षात ठेव, आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात आहे, हे विसरू नकोस!” अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी अबू आझमी याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
_नेमकं काय म्हणाले अबू आझमी?_
समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी यांनी म्हटले होते की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लीम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केली नाही. पण, ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिमांच्या बाबतीत हे करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
