राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्यच्या चर्चांवर मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली असून नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही.”
त्याचबरोबर यावेळी पुढे बोलताना “अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते,” असे धनंजय मुंडेंनी सांगितल्याचा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी यांनी केला आहे.
अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागले. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी नमूद केलं.
