शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुळ्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे.
ते रविवारी (३० जुलै) धुळ्यात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाने आयोजित केलेल्या सहा ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, “धुळ्यात जे काम सुरू आहे त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी बोलणं आम्हाला सध्या जरा अडचणीचं आहे. मात्र, त्यातून आज ना उद्या कधीतरी मार्ग निघतील. ज्यावेळी मार्ग निघतील त्यावेळी राज्य सरकारलाही या कामासाठी मदत करण्यासाठी भाग पाडण्यास फारशी काही अडचण येणार नाही.”
“उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर कदाचित महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा विशेष वेगळं काही सांगायची गरज नाही. यातील राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने अशा संस्थांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे”, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
