हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह जनतेलाही पावसाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.
आता हवामान खात्याने शेतकऱ्यांना खूशखबर देत पाऊस लवकरच परत येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसानेही आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवायचे ठरवले आहे. या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पाऊस दमदार प्रवेश करणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार आहे.
पालघर, रायगड, नवी मुंबईत ढगाळ वातावरण असेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून सध्या उत्तरेकडे म्हणजे अमृतसर, कर्नाल, मेरठ, लखनऊपासून नागालँडपर्यंत सक्रिय आहे.
आता राज्यातही मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी पूरक वातावरण तयार होत असल्याने या आठवड्यात पवासाचे दमदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे. राज्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. हवामान खात्याने पाऊस लवकरच येणार असल्याचा शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
