राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी हाती आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण विभागाने शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
तसेच त्यानुसार त्यानुसार अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, पुणे, नगर, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात शिक्षक भरती होणार आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी १३ जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ‘अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 ‘टक्के रिक्त पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमदेवारच पात्र असणार आहे. या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे’, अशी सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे.
‘१ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती होत आहे. या भरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भरतीत ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (टेट) -२०२२’ परीक्षा दिलेल्या ‘एसटी-पेसा’ उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. टेट परीक्षा -२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी, असे मांढरे यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
तसेच , या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात यावा, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
