राज्यात पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत….

मुंबई – गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. यात पुणे,ठाणे यासह मुंबईतील (Mumbai) काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुंबईला पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवसांसाठी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये कोकणातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने दुपारच्या सत्रातील शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून आणि आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा, असेही आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment