संगमनेर(DSNews24) भ्रष्टाचारच जणू शिष्टाचार व्हावा असा प्रत्यय येतोय संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील थापलिंग खंडोबा देवस्थान ते ठाकरवाडी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे हे काम अतिशय निकृष्ट झाले होते. गेल्या वर्षभरापासून रिपाईच्या वतीने यासंदर्भात पाठपुरावा करीत असताना रिपाईने उपोषण केले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी या रस्त्याबाबत लेखी आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत या रस्त्याचे काम चालू झाले नाही हे काम लवकरच पूर्ण न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा संगमनेर तालुक्याचे पठार भाग प्रमुख संपत भोसले यांनी दिला आहे.
तीन वर्षापासून ठेकेदाराने काम चालू करून देखील पूर्ण झालेले नाही. यात ठेकेदाराला दोषी ठरवून त्यास काळया यादीत टाकले आहे हे फक्त कागदोपत्रीच दाखवविले आहे. ठेकेदाराला या कामाची साठ टक्के रक्कम देखील अदा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे काम पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन उपअभियंता यांनी दिले होते. तसेच तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी देखील आदेश दिले होते. तरी देखील आजपर्यंत या कामाला सुरुवात झाली नाहीं.
गेंड्याची कातडी असलेले ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यामुळे आज अखेर संगमनेर तालुक्याचे पठार भागाचे रिपाईचे विभाग प्रमुख संपत भोसले यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील लेखी निवेदन पत्र तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले. या कामाला पुढील आठ दिवसात सुरुवात न झाल्यास दिनांक २३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय समोर स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्यात येईल असा इशारा श्री.भोसले यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे
