पारनेर(DSNews24/किरण पुरी) पारनेर येथे शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेत पाण्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच भाषण सुरू असताना पारनेच्या पाण्याच्या प्रश्नाचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, संतोष वाबळे, वसंत साठे, बाळासाहेब वाळुंज, प्रविण खोडदे, विशाल करंजुले, संजय भोर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भर सभेत उठून पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाच अशी घोषणाबाजी केली.
तसेच भर सभेत पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळालेच पाहिजे असा बॅनर झळकविण्यात आला. यावेळी अजितदादांनी भूमिपुत्रांच्या मागणीकडे तातडीने लक्ष देत तुम्हाला निलेश लंकेंनी पाठविले का? असा सवाल विचारला. त्यानंतर पाण्याचा प्रश्नावर भूमिका स्पष्ट करत पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी अडवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी अजितदादांनी सांगितले.
लोकसभेपूर्वी पारनेर या ठिकाणी झालेल्या सभेत जेष्ठ शेतकरी वसंत शिंदे यांनी पाण्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणातून सांगितले होते की, एक वर्षाच्या आत उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन निधी टाकतो. पण त्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तसेच या प्रश्नावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी उपोषण देखील केले होते. मात्र अजितदादांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देऊन भूमिका स्पष्ट करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पारनेर येथे झालेल्या जाहीर सभेत उभे राहून घोषणाबाजी केली. तसेच यावेळी सभेत हातात बोर्ड घेऊन झळकविण्यात आला. यावर अजितदादांनीही या मागणीची तातडीने दखल घेत भूमिका स्पष्ट केली. मात्र गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पारनेरचा पाणी प्रश्न उपोषणाच्या माध्यमातून पेटविला होता. याच पाण्याचा प्रश्नासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही लक्ष वेधल्याने पारनेरमधे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे
