मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला 50 जागा जिंकतानाही चांगलीच दमछाक झाली.
त्यानंतर आता, महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा गेम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्याने याचे संकेत दिले आहेत. मागील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असलेल्या काँग्रेस मोठा झटका या निवडणुकीत बसला. त्यानंतर आता, भाजपकडूनही हादरा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर, विरोधी बाकावरील शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागांवर विजय मिळाला. राज्यात पुरेशा संख्याबळा अभावी आता विरोधी पक्षनेताही नसणार आहे. सत्ताधारी आमदारांकडून मविआचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी गौप्यस्फोट केला आहे.
काँग्रेसचा गेम होणार?
भाजपचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितले की, काँग्रेसच्या अतिशय कमी जागा आल्या आहेत. राज्यातील 288 पैकी फक्त 16 जागा निवडून आलेले आहेत. राज्यात 55 ते 60 टक्के असणारा काँग्रेस पक्ष हा दहा टक्केवारीवर आलेला आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला गतीला अग्रेसर करण्याकरता काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं त्यांनी म्हटले. जनतेपासून काँग्रेसची नाळ तुटलेली आहे. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे तर पडले. तर, नाना पटोले हे अतिशय कमी मताने जिंकलेले आहेत. काँग्रेससाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे.
महाराष्ट्रात गोवा पॅटर्न?
आशिष देशमुख यांनी सांगितले की, आता काँग्रेस आमदार नी भाजपमध्ये यावं. सध्या तरी काँग्रेसचे काही आमदार भाजपात विलीन होण्यासाठी सकारात्मक आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या कामामुळे अग्रेसर ठेवण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार भाजपात विलीन झाल्यास हा गोवा पॅटर्न ठरणार आहे. गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्यासह 8 आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला होता. सध्या गोव्यात काँग्रेसचे सध्या 3 आमदार आहेत.
