सोमवारी रात्री नगर कल्याण मार्गावर इनोव्हा आणि पीकअपचा भीषण अपघात झाला. ही घटना माळशेज घाटाजवळ रात्री १० च्या सुमारास घडली असून यात इनोव्हातील पाच जण ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सुदैवाने या अपघातात पीकअप चालक थोडक्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. एवढेच नाही तर इनोव्हामधील एयरबॅग तुटून वेगळी झाली होती.
इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते.
मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री १०च्या सुमारास माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक सचिन कांडगे हे पथकासह घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांनी आणले. परंतु त्यातील पाच जणांना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
