विखे – थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार, आता संगमनेरमध्ये….

विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली अन् काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा हादरा बसला. मंत्री विखे यांनी अमोल खताळ यांच्या आमदारकीच्या रुपाने संगमनेरमध्ये विधानसभेत यश मिळवले.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये यश मिळवण्याची तयारी मंत्री विखेंनी आमदार खताळ यांच्या माध्यमातून सुरू केली असून, तशा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा मंत्रि‍पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते श्रीक्षेत्र निझर्णेश्वर इथं येत दर्शन घेतलं. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक उपस्थित होते. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कैलास तांबे, मच्छिंद्र शेटे उपस्थित होते.

मंत्री विखे यांनी संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना पुढचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याचे सूतोवाच केले. आमदार अमोल खताळ यांच्या विजयाने संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊ शकते, हा विश्वास सर्वांना मिळाल्याने भविष्यात अशाच संघटीतपणे आपल्याला संगमनेर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तयारीला लागा अशा सूचना केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे आणि थोरात यांचा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मंत्री विखे स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेरमध्ये लक्ष घालणार, हे पुन्हा निश्चित झालं आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघटीतपणे संगमनेरमध्ये यश मिळवायचे, अशी बांधणी मंत्री विखे करणार असल्याचे दिसते.

आमदार अमोल खताळ यांनी देखील संगमनेर तालुक्यात भविष्यात मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, असे सांगून तयारी करणार असल्याचे संकेत दिले. तसेच मंत्रि‍पदी निवड झाल्यानिमित्ताने मंत्री विखे यांचा संगमनेरमध्ये पाच जानेवारीला नागरी सत्कार आयोजित केल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.

Leave a Comment