मुंबई: ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.’ अशी प्रचंड मोठी घोषणा शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर मेळाव्यात करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आता त्यांच्या याच घोषणेने इंडिया आघाडीत मात्र खळबळ माजली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना (UBT) सह महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून शिवसैनिकांनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावं अशी मागणी केली होती. ज्याबाबत आता स्वत: उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
‘आज माझ्याकडे काहीच नाही.. कोणासाठी लढू, कशासाठी लढू? दुसरा कोणी असता तर हिंमत हरून खाली बसला असता. मी हिंमत हरणारा नाही. मी मैदानात पाठ दाखवणारा नाहीए. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन.. हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी अजिबात हार मानणार नाही.’
‘मी पुन्हा जिद्दीने उभा आहे. लढतोय ते तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या भरोश्यावर लढतोय. अरे एवढे सगळे भाडोत्री तुम्ही घेतले आहेत. तरी सुद्धा तुमची भूक भागत नाही?’
‘पैसे देऊन विकत घेत आहात? वामनराव महाडिकांच्या भाषेत बोलायचं तर विकली जाते ती विष्ठा असते. शिल्लक असते ती निष्ठा असते. ही सगळी निष्ठा माझ्यासोबत आहे.’
‘येत्या काही काळात महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय.. मुंबई, संभाजीनगर, नाशिक.. सगळ्यांशी मी बोललोय. सगळ्यांचं मत आहे की, एकटं लढा. ताकद आहे?’
‘अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठीकए… अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या.. तुमची तयारी बघू द्या.. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून आधी बाहेर या. ज्याक्षणी माझी खात्री पटेल की, आपली तयारी झालीए.. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.’
