राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी

राज्यात महिलांसाठी (Women) लवकरच नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या (State Government) महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र सरकारने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या गृहविभागात यापूर्वी मोठी भरती झाली होती. आता महिला व बालविकास विभागात भरती होत आहे. ही भरतीप्रक्रिया १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्तपदांचीही भरती प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाने अद्याप याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत. मात्र, या संदर्भातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सागंण्यात येत आहे. दुसरीकडे महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे हजारो महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment