Ajit pawar : नवी मुंबईच्या खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी घडलेली दुर्घटनेमुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार वेळी घडलेली दुर्घटना सरकारनिर्मित आपत्ती असल्याचे म्हणत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
अजित पवार यांचे पत्र जसेच्या तसं
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा (सोहळा दि. १६ एप्रिल २०२३ रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळयाला लाखो अनुयायी उपस्थित होते. सोहळयादरम्यान अनेक अनुयांयाना उष्माघाताचा त्रास झाला.
तब्बल ७ तास लाखो अनुयायी या पुरस्कार वितरणावेळी उन्हात बसून होते. या दरम्यान प्रंचड असणाऱ्या उन्हामुळे अनेकांना चक्कर आली, अनेकांना उलटीचा त्रास होऊन या दुर्देवी घटनेत ११ निष्पाप अनुयांयाचा नाहक बळी गेला. काल घटना घडल्यानंतर मी स्वतः नवी मुंबईतील एम. जी. एम रुग्णालयात जाऊन रुग्णांची, रुग्णांच्या नातेवाईकांची व डॉक्टरांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन सुन्न करणारा होता.
सर्वप्रथम मी मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली अपूर्ण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि लाखो श्री सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. राज्यातील मागील काही दिवसातील तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रचंड मोठी लाट आलेली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात आहेत. साहजिकच अशा प्रकारच्या गौरव सोहळयाला लाखो अनुयायी उपस्थित राहतील ही धारणा लक्षात घेणे गरजेचे होते.
एवढा भव्यदिव्य कार्यक्रम मोकळया मौदानावर, दुपारच्या वेळी आयोजित करून निष्पाप अनुयायांच्या जीवाशी खेळण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले अशी भावना सर्वसामान्यांची झाली आहे. उष्णतेची प्रचंड लाट आलेलो असताना बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करुन त्याचे थेट प्रक्षेपण करुन हे मृत्यू टाळता येण्यासारखे होते. परंतु काही तरी भव्य दिव्य करुन दाखवण्याच्या अट्टाहासापायी निष्पाप अनुयायांना वेठीस धरले गेले आणि त्यात ११ अनुयायाचा नाहक बळी गेला.
या कार्यक्रमाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले होते. ही दुर्देवी घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. शासनाच्या नियोजन शून्य आयोजनामुळे निष्पाप अनुयायांचा बळी गेला आहे. या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे.
या घडलेल्या घटनेबाबत मी पुढील मागण्या आपणाकडे करीत आहे.
१. सरकारविरोधात तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२. कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्देवी घटना याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी.
३. मृतांच्या नातेवाईकांना केवळ ५ लाख रुपयांची तुटपुंजी मदत करून सरकारने आपली जबाबदारी झटकू नये. त्याप्रत्येक मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
४. जखमीवर अनुयांयावर मोफत उपचार करुन त्यांना प्रत्येकी रु.५ लाखांची मदत करण्यात यावी, ही विनंती.
