राज्यावर अवकाळीचं संकट! अहिल्यानगरसह ११ जिल्ह्यांना इशारा 

राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये उकाडा वाढला असून उन्हाचे चटके लागू लागले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सर्वांसाठी महत्वाचे राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ११ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर मंगळवारी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

त्याचसोबच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा, गहूसह अन्य पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

Leave a Comment