राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल केली. शरद पवार यांचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला.
एवढंच नव्हे तर अजित पवार यांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला. निवृत्त होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार यांनीही चिरफाड केली.
जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याची चिंता करू नका. त्यांना सुखात राहू द्या. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे.
घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.
