Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत आजपासून मुसळधार पाऊस….  

Maharashtra Rain Update : मागील आठवड्यात राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अशातच आता हवामान विभागाने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भाच्या जिल्ह्यांत दि. १४ ते २० सप्टेंबर या सात दिवसाच्या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यांत आजपासून म्हणजेच शुक्रवार दि. १५ ते १८ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवार दि. १९ ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत याठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात.

त्याचबरोबर शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरातून स्थलांतरित होणारे व छत्तीसगडमधील ‘कोरबा’ जिल्ह्यादरम्यान स्थिरावणारे असे साडेसात किमी उंचीपर्यंतच्या असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राहून नैरूक्त मान्सूनी वारे बळकट होऊन कोकणातून सह्याद्रीकडे झेपावतील. त्यामुळे कोकण आणि सह्याद्री ओलांडून पश्चिम, उत्तर, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्याच्या काही भागात आर्द्रतायुक्त वारे वाहण्याच्या शक्यतेमुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर या ४ जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणसमूहात जोरदार पावसाची शक्यता असून रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन (दि.२५ ते ३० सप्टेंबर व ९ ते १३ ऑक्टोबर) आवर्तनातून चांगला पाऊस अपेक्षित आहे. तेव्हा कदाचित धरणे ओसंडून नद्याही पूर पाण्याने खळाळण्याची शक्यता आहे. तसेच या पावसामुळे सहयाद्रीच्या कुशीसह इतर सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment