संगमनेर(DSNews24) बिरेवाडीसारख्या अत्यंत ग्रामीण भागातील संतोष सागर यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी त्यांचे कौतुक करत, ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच संतोष सागर यांनी याच पदावर न थांबता पुढील स्पर्धा परीक्षा देत उच्च पदावर झेप घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुरजवळील बिरेवाडी (ता. संगमनेर) येथील सुपुत्र संतोष शारदा सूर्यभान सागर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल धांदरफळ खुर्द येथील संपत खताळ परिवाराच्या वतीने सासरवाडीत त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती संतोष सागर यांची पत्नी प्रणिती सागर, आई शारदा सागर, सासरे संपत खताळ, अर्जुन महाराज खताळ, भाजप तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले, शिवसेना उपतालुकाप्रमुख बादशाह गुंजाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, सध्या राज्यात महायुती सरकारच्या माध्य मातून मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरभरती सुरू आहे आणि ही युवकांसाठी सुवर्णसंधी आहे.राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली भरती प्रक्रियेला वेग आला असून ग्रामीण भागातील तरुणांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“आज मला मिळालेले यश हे केवळ माझे नसून माझ्या कुटुंबाच्या पाठबळाचे फळ आहे. त्यांच्या विश्वास, त्याग आणि सततच्या प्रोत्साहनामुळेच मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो. माझी निवड झाल्यानंतर सर्वप्रथम माझा सन्मान सासरवाडीत झाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक गोष्ट आहे. अशी साथ देणारी सासरवाडी मिळणे हे खरोखर भाग्याची बाब आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, पुढील काळात आणखी मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहीन.”
– संतोष सागर (पोलीस उपनिरीक्षक)
