राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे.
राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला. परंतु यंदा उशिराने २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे.
या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली.
राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला.
