राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राजकीय ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवत राज्यभर ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन सुरु केलं आहे. याच ओबीसी नेत्यांची आज शनिवारी पुण्यातील इंदापूर तालुक्यात सभा संपन्न झाली.
या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असं खुलं चॅलेंज मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यात दिलं.
मंत्री छगन भुजबळ यांनी इंदापुरातील ओबीसी मेळाव्यातील उपस्थितांना संबोधित केलं. या मेळाव्यात भुजबळ म्हणाले, ‘बीडमध्ये घर जाळली,अनेक लोक जीव मुठीत घेऊन वाचले. इंदापुरात असलेल्या हर्षवर्धन पाटील आणि माझे मित्र विजयसिंह मोहिते पाटील यांना विचारा की ओबीसी प्रमाणपत्र हवंय का? आरक्षणामुळे ओबीसींची गरिबी हटली नाही’.
‘महाराष्ट्रामध्ये सरसकट आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षणाची मागणी होत आहे. जरांगे यांना काय समजत नाही किंवा माहिती नाही. कळत नाही. मराठा समाजाला काही मिळाले नाही असंही नाही. ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यात पण अनेक जाती आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.
‘आता आमच्या सरकारला सांगणे आहे की २७ टक्के आरक्षण आहे. ते पूर्ण भरा. मराठा समाजाला चांगल्या नोकऱ्या दिल्या. सारथीमार्फत अनेक निधी दिला. एवढ सगळं करून आमची पात्रता काढतात, असं ते म्हणाले.
सभेदरम्यान भुजबळांनी जरांगे यांच्या व्हिडिओ क्लिप ऐकवत त्यांच्या हिंदीची खिल्ली उडवली. त्यांना हिंदी बोलता येत नाही. जरांगे हे अक्कलेने दिव्यांग झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यांच प्रशासन एक नंबर आहे. अधिकाऱ्यांनी तसं काम केलं पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
‘मला येवल्याचं वेडपट म्हणत आहे. पण जरांगे यांचा जन्म झाला होता का नव्हता, तेव्हा मी महापौर आणि आमदार झालो. तेही दोनदा झालो. जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं. खरंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, अशी टीका भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली.
