पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक ४ महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा केला जातो.
आतापर्यंत या योजनेचे १५ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता १६ वा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.
अशातच पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील हप्त्यादरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. कारण, पीएम किसानसाठी पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांच्या नावाची छाननी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे.
मागील हप्त्यांमध्ये देखील पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आलं होतं. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे. आता १६ व्या हप्त्यादरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात.
अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केली नाही. त्यांनी लवकरात लवकर केवायसी करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी पीएम किसानच्या १६ वा हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकतात.
गेल्या अनेक हप्त्यांमध्ये, जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान, लाभार्थ्यांच्या हप्त्यांमधून मोठ्या संख्येने लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही ही परिस्थिती उद्भवू शकते. याशिवाय, ई-केवायसी न केल्याने, तुम्ही लाभार्थी यादीतूनही बाहेर जाऊ शकता.
याशिवाय अर्जाच्या स्थितीत झालेल्या चुका देखील लाभार्थ्यांना यादीतून बाहेर काढू शकतात. शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करू शकतात. योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
