निलेश लंके हे मुंबई दौऱ्यावर आहेत. या मुंबई दौऱ्यादरम्यान, निलेश लंके यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवतं.
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण… बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा घेऊन राजकारणाचा प्रवास सुरु केला होता. शिवसेनेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, तालुकाप्रमुख असे पद भूषवलं. मी खासदार झाल्याने उद्धव ठाकरेंनाही आनंद झाला. विधानसभा निवडणुकीत नगरच्या १२ पैकी १२ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात ठाकरेंशी देखील बोललो आहे’
‘महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्या. त्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे. उद्धव ठाकरेंना व्यग्र कामांमुळे नगरमध्ये प्रचाराला येता आलं नाही. मात्र, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी माझा प्रचार केला. विधानसभा किंवा मेळावा होईल, त्यावेळी पहिला मेळावा नगरमध्ये घेऊ असं त्यांनी मला सांगितलं आहे, असे लंके म्हणाले.
