विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने, सर्वच पक्षावर संघटनात्मक पातळीवर जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांनी नव्यानं पक्ष संघटनेवर काम करण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली, असताना त्यांना अहमदनगर जिल्ह्यातून मोठा धक्का बसला आहे. श्रीगोंद्यातील पक्षाचे दिग्गज नेते बाळासाहेब नाहाटा यांनी अजितदादांनं दिलेलं पद ऐन विधानसभा निवडणुकीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बाळासाहेब नाहाटा यांनी अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्र नगर जिल्ह्यात असतानाच, बाळासाहेब नाहाटा यांनी अजितदादांची (Ajit Pawar) साथ सोडल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, गुरूवारी सायंकाळी शिवस्वराज्य यात्रा श्रीगोंदे तालुक्यात होती.
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना बाळासाहेब नाहाटा यांनी कोणावर कसलेही आरोप किंवा भूमिका स्पष्ट केलेली नाही. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला? याची उत्सुकता वाढली आहे. पक्षाने मला वेळो वेळी संधी दिली. त्यामुळे मी पक्ष नेतृत्वाचा आभारी आहे. राजीनामा देण्यामागे कोणतीही नाराजी नसून मी यापुढेही पक्षाच्या संघटनात्मक काम करतच राहणार आहेत, असे बाळासाहेब नाहाटा यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादांनी मला महाराष्ट्र राज्य बाजार माहिती महासंघाचे अध्यक्ष पद दिले. महाराष्ट्रातील 322 मार्केट कमिटीचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तसंच राज्याच्या कृषी आणि पणन मंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. याशिवाय मला नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. धुळे जिल्हाचे विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक पदाची जबाबदारी दिली. एवढ्या पदावर काम करणे शक्य नसल्याने अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगर जिल्हाध्यक्षपदाचा राजीमाना दिला असून, पदातून कार्यमुक्त करण्याची विनंती बाळासाहेब नाहाटा यांनी सुनील तटकरेंकडे केली आहे.
