विधानसभा निवडणुक जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा 

जालना : राज्यात विधासभा निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेतला नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी सरकार मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका घेईल, अशी आशा मनोज जरांगे पाटील यांना होती. मात्र, राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेतली नाही. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधाला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठ्यांना बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणीस यांनी केलं. मराठ्यांना आशा होती की, सरकार आपल्या लेकरांना आरक्षण देईल. पण सरकारनं आशा संपवली. आंदोलन आणि मराठा समाज एकत्र ठेवायचा नाही. मराठ्यांची पोर आरक्षणापासून वंचित राहिले पाहिजे, भिकारी झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात काम केलं. मराठ्यांना डिवचण्यासाठी ओबीसीत जाती घातल्या’.

जरांगेंची राज्य सरकारवर टीका

‘सरकारला तुमची लेकरं मेले तरी त्यांना देणंघेणं नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांनी पण घेतला आहे. मराठ्यांची पोरं श्रीमंत होण्यापासून त्यांनी रोखले. मराठ्यांचे पोरं त्यांना भिकारी करायचे आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल. लेकरांना जवळ घेऊन आरक्षणाची किंमत विचारा. आता योग्य वेळ आहे, पाच वर्ष हात पसरवल्या पेक्षा गोरगरिबांची लाट आली आहे, अशी लाट पुन्हा येणार नाही. तुम्ही जर पक्षाचे बाजुने राहिले तर रडण्याची वेळ येणार आहे, असे ते म्हणाले.

जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांवर रोष

‘देवेंद्र फडणीस यांनी मराठ्यांचा कार्यक्रम लावला आहे. ते मराठा संपवायला यशस्वी झाले. या संकटातून बाहेर पाडायचं असेल तर मताची शक्ती दाखवावी लागेल. हे राज्याच्या बाहेरून मत आणू शकत नाही. मत विकायचं नाही. तुमच्यावर दबाव आला तर झुगारून लावा. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. आता प्लानिंगने डाव टाकायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांना हसावं की रडाव हे कळलं नाही पाहिजे. आमची बैठक होणार आहे. कोणाच्या जागा वाढवायचा, ते आम्ही ठरवणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

‘समाजाने शेवटच्या दोन दिवसात निर्णय घ्या. मतदानाचा दिवस मराठ्यांचा असेल. बैठक घेऊन काय करायचं ठरवणार आहे. समाजाची बैठक घेऊनच विधानसभेचा निर्णय घेणार आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment