संगमनेर – माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जे विधान केले ते अतिशय गलिच्छ, घाणेरडे आणि महाराष्ट्राची राजकीय व सामाजिक संस्कृती नासविणारे विधान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी शनिवारी केली.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शुक्रवारी रात्री संतप्त जमावाने सुजय विखे यांच्या पोस्टरला काळे फासले त्यानंतर संतप्त जमावाने वाहन जाळले. त्यानंतर शनिवार (26 ऑक्टोबर) ला सुजय विखे यांनी आपल्याला मारण्याचा हा पूर्वनियोजित कट होता असा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी सामाजिक माध्यमातून या घटनेचा निषेध केला. संगमनेर येथे जावून जयश्री थोरात यांची भेट घेतली.
निलेश लंके म्हणाले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या थोर व्यक्तीमत्त्वाची ही भूमी आहे. या भूमीने नेहमीच महिलांचा सन्मान केला. पण या लोकांच्या डोक्यात सत्तेची एवढी नशा गेली आहे की, यांना दुसऱ्यांच्या लेकीबाळी देखील दिसत नाहीत.
ते पुढे म्हणाले, मागील लोकसभा निवडणूकीत देखील त्या कंपूने माझ्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषा वापरली. सुजय विखे हे अशा पद्धतीच्या वागण्यातून सत्तेच्या मोहापायी तरुणांना बिघडविण्याचे काम करीत आहेत. लक्षात ठेवा, माता भगिनींबाबत बोलणे तर दूरच केवळ वाकड्या नजरेने जरी पाहिले तरी त्याचा चौरंग करण्याचे काम या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात झालेले आहे. अशा या थोर उदात्त राज्यात ही घाणेरडी मानसिकता पेरणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा वेळोवेळी दाखवून दिलेली आहे
