घटस्फोटाचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी विवाहितेला संपवलं

वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या वडिलांनी जावयावरच हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मंजू संदीप पचारे (24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत असल्याने मंजूने त्याचे घर सोडले आणि वडील राजकुमार पारसे यांच्याकडे वारीसपुरा, कामठी येथे राहू लागली. मंजूने पती संदीप रामू पचारे याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून 2026 रोजी लागल्याची माहिती तिचे वडील राजकुमार पारसे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मंजू शेतातून काम करून घरी आली.

वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिरणवार गल्लीत अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी तिचा मोबाईल घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Leave a Comment