आगामी दोन दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (heavy rain) होणार आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शुक्रवारी दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. झालेल्या वादळी पावसाने हवामान दमट झाल्याने उष्णता वाढल्याचे आढळून आले.
दरम्यान, राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असताना पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज (दि.8) शनिवारी राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे.
