नवी दिल्ली – लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवषी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार (Sansad Ratna Award) २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राने बाजी मारली असून, त्यामध्ये सात जणांचा समावेश आहे.
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. यंदा सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तूहरी महताब आणि एन के प्रेमचंद्रन यांना पुरस्कार मिळाला आहे. तर अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ , मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
पुरस्काराची पार्श्वभूमी
भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. २०१० ला या पुरस्काराचे अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले. दरवर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो.
केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात
