ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राज्यभरात जोर धरत असतानाच आता राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
त्यानंतर दोन्ही नेते सभागृहात पोहोचल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाषावर बोलताना थेट उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे.
नेमकं काय घडलं?
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ विधानपरिषदेत पार पडला. यावेळी अंबादास दानवेंना निरोप देताना भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान करत उद्धव ठाकरेंनाच ऑफर दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या टर्मचा अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे. आपल्या शुभेच्छा आहेत पुन्हा त्यांनी या सभागृहात यावं. आल्यावर त्याच पदावर असावं असं नाही… मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवा-पळवी करतात, उद्धवजी…. आता उद्धवजी 2029 पर्यंत तर काही स्कोप नाहीये. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाहीये.. तुम्हाला एकडे यायचा स्कोप.. विचार करता येईल… म्हणजे, त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करु…
ऑफर की टोला?
राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट त्यानंतर फडणवीस यांनी सभागृहातून उद्धव ठाकरे यांना दिलेली ऑफर यावरुन विविध चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही ऑफर आहे की टोला लगावला यावरुन विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
