पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते आणि ट्रि-मॅन म्हणून ओळखले जाणारे, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांचा ६६ वा वाढदिवस पुण्यामध्ये साजरा झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. याच कार्यक्रमात एका सामाजिक कार्यकर्त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी कुठुन उठलो अन् पुण्याचा पालकमंत्री झालो……कुणीही उठते आणि मला उपदेश करते, अशी मिश्किल टिप्पणीही केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
पुणेरी टोमणे जगप्रसिद्ध आहेत, मात्र याचा प्रत्यय अजित पवार यांना देखील आल्याचं बघायला मिळालं आहे. ट्रि मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्या निमित्त अजित दादा उपस्थितांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगत होते, यावेळी त्यांनी सरकारचा कार्यकाळ संपण्याआधी राज्यात 100 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं देखील सांगितले.
मात्र, ही बाब न पटल्याने प्रेक्षकात बसलेले जेष्ठा सामाजिक कार्यकर्ते उठले आणि त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सुरू असलेल्या आणि होणाऱ्या बेसुमार वृक्ष तोडीकडे दादांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र भापकरांकडून विचारलेला प्रश्न हा विनंती वजा टोमणा असल्याचं दादांच्या लक्षात आलं आणि त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर देत कुठुन उठलो अन् पुण्याचा पालकमंत्री झालो कुणीही उठून मलाच उपदेश करते असं म्हणत हात जोडले.
दादांच्या मिश्किल स्वभावातून आलेलं हे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलं आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अजित पवार हे पर्यावरणाच्या बाबतीत आधी संवेदनशील होते मात्र आता ते कुणाच ऐकूनही घेत नसल्याचं सांगत त्यांना मुख्यमंत्र्यांचा वान नाहीतर गुण लागल्याचा पुन्हा एक पुणेरी टोमणा मारला आहे.
