अहिल्यानगर – नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यांत आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम 2025 च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. यामुळे राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकर्यांना ई- पाहणीसह पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.
महसूल विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून राज्यात खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून सहायक स्तरावरून नोंदणी सुरू करण्यात आली होती, ती मुदत 29 ऑक्टोबर होती. मात्र, नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी होऊ शकली नाही. आकडेवारीनुसार, आतापर्यंत डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत राज्यातील एकूण क्षेत्रापैकी केवळ 36.12 टक्के पिकांचीच नोंद पूर्ण झाली आहे.
पीक नोंदणी न झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, पीक विमा आणि पीक कर्ज यासारख्या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा कृषी विभागाच्यावतीने शेतकर्यांनी ई-पिक पाहणीला मुदतवाढ आलेली असल्याने शेतकर्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत खरीप हंगाम 2025 ची ई-पिक पाहणी करून घ्यावी, यासाठी शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात अद्याप खरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी झालेली नाही. पीक विमा योजनेसाठी ई-पीक पाहणी सक्तीची असून अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभासाठी ई-पीक पाहणी फायद्याची असून शेतकर्यांना पीक कर्जासाठी देखील ई-पीक पाहीणीचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकर्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी व महसूल विभागाने केलेले आहे.
