चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच ; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

अखेर भारतीय क्रिकेट चाहत्यांचं आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. महिलांच्या टीम इंडियाने आयसीसी वर्ल्डकपवर अखेर नाव कोरलं आहे. आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ रन्सने पराभव करत पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीमने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर ५२ रन्सने विजय मिळवत हा रोमांचक सामना आपल्या नावावर केला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत २९८ रन्सचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर नंतर उत्कृष्ट गोलंदाजी करत आफ्रिकेची संपूर्ण टीम २४६ रन्सवर रोखली. या सामन्यात दीप्ती शर्मानं उत्तम कामगिरी करत ५ विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाची भक्कम सुरुवात

भारतासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या जोडीने दमदार सुरुवात केली. दोघींनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. फक्त ७ व्या ओव्हरमध्ये भारताने ५० रन्स पूर्ण केले. कर्णधार हरमनप्रीत कौर २० रन्स केले. मात्र त्यानंतर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी डाव सांभाळला.

या दोघींनी संयमी पण प्रभावी फलंदाजी करत स्कोरबोर्ड पुढे नेला. दीप्तीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, तर ऋचानंही ३४ रन्सची उपयुक्त खेळी केली. अखेरीस भारताने ४९ ओव्हर्समध्ये ५ बाद २९८ रन्स करत दक्षिण आफ्रिकेला २९९ रन्सचं लक्ष्य दिलं होतं.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कशी झाली?

लॉरा वोलवार्ट आणि ताजमिन ब्रिट्स यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी डावाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा खेळ चांगला दिसत होता आणि ९ व्या ओव्हरमध्येच स्कोर ५० च्या पुढे गेला. पण १० व्या ओव्हरमध्ये अमनजोत कौरनं अप्रतिम थ्रो करत ब्रिट्सला २३ रन्सने रनआउट केलं. त्यानंतर श्री चरणीनं दुसरी विकेट घेतली आणि बॉश शून्यावर परतली. शेफालीनं देखील गोलंदाजीमध्ये चमक दाखवत सलग दोन विकेट घेतल्या.

दीप्ती शर्माची गोलंदाजी आणि विजयावर शिक्कामोर्तब

या सामन्यात भारताची गोलंदाजी खरोखर अप्रतिम ठरली. विशेषतः दीप्ती शर्मानं ५ विकेट घेत विरोधी फलंदाजांना माघारी धाडलं. यावेळी दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण २४६ रन्सवर गारद झाला आणि भारतानं हा सामना ५२ रन्सने जिंकला.

Leave a Comment