लग्न म्हटलं की, गडबड गोंधळ आलाच. कधी डीजेवर नाचण्यावरून लग्नात वाद होतो. तर कधी नवरदेवाच्या हट्टामुळे याचा मनस्ताप मात्र, वऱ्हाडी मंडळींना सहन करावा लागतो.
असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे एका नवरदेवाला भर मंडपात नवरीकडील मंडळींनी चांगलाच चोप दिलाय.
विशेष म्हणजे मुलीकडील मंडळींना नवरदेव आणि त्याच्या काकाला बांधून ठेवलं होतं. अखेर, पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींची समजूत घालून प्रकरण शांत केलं. या हायव्होल्टेज ड्राम्याची संपूर्ण जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता. दोन्ही गावं एकमेकांपासून केवळ ११ किमीच्या अंतरावर आहेत. सोमवारी रात्री ७ वाजता विजेंद्रच्या कुटुंबातील लोक वऱ्हाड घेऊन नागल गावात पोहोचले.
रात्री ९ वाजता फेरे घेण्यात येणार होते. तत्पूर्वी मुलीकडच्या मंडळींना गावातून वरात काढण्याची सर्वच तयारी केली होती. त्यानुसार, नवरदेवाची वरातही निघाली.
दरम्यान, रात्री ९ वाजता लग्नात फेरे होण्यापूर्वी नवरेदवाने पैशांसह बोलेरो गाडीची मागणी केली. तसेच, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तरच आपण लग्नास तयार होणार, फेरे घेणार असा हट्टच केला.
या अडेलपणाच्या भूमिकेमुळे दोन्ही मंडळींमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी, मुलीच्या नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी नवरदेव विजेंद्र आणि त्याचे चुलते पप्पूलाल मणी यांची धुलाई केली. कपडेही फाडले. त्यामुळे, दोन्हीकडील लोकं आमने-सामने आले. लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला.
मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवरदेव व नवरदेवाच्या काकांनी धूम ठोकली. याप्रकरणी विजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांसोबत नवरदेव आणि त्याचे काका पुन्हा मंडपात गेले. त्यावेळी, मुलीच्या मंडळींनी दोघांनाही बांधून ठेवलं होतं. अखेर, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला.
