राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेल्या उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? याची सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. कारण आता या निवडणुका थेट पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.
सुप्रीम कोर्टात काय घडलं?
महाराष्ट्रातील उर्वरित २० जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं या निवडणुकांसंदर्भात २१ आणि २२ जुलै रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल असं निश्चित केलं. त्यामुळं आता उर्वरित उर्वरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबतची सुनावणी जुलै महिन्यात होईल. या सुनावणीत जर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला तर त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
पावसाळ्यानंतरच निवडणुका का?
पण शक्यतो पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका घेणं निवडणूक आयोगाकडून टाळलं जातं. कारण पावसामुळं निवडणूक प्रक्रिया राबवणं हे कठीण काम असतं. जरी निवडणुका घेतल्या तरी त्याला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळू शकतो, त्यामुळं पावसाळा पार पडल्यानंतरच शक्यतो निवडणुकांचा कार्यक्रम ठरवला जातो.
कधी होण्याची शक्यता?
त्यामुळं आता खुद्द सुप्रीम कोर्टानंच जुलै महिन्यांत अर्थात चाडेचार महिन्यांनी पावसाळ्यातच याची सुनावणी ठेवल्यानंतर आता या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
