छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. पतीसह सासरच्यांकडून सुरू असलेला छळाळा कंटाळून २५ वर्षीय ईश्वरी बनकर हिने टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे.
काल (बुधवारी, ता ८) तिच्या शवविच्छेदनावेळी कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आणि सासरच्यांवर कठोर कारवाईची मागणी करीत घाटीत ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सात जणांना अटक केली आहे.
२५ वर्षीय ईश्वरीचा २८ जून २०२० रोजी छत्रपती संभाजीनगरमधील अजय अशोक बनकर याच्यासोबत विवाह झाला. ते भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनीत राहत होते. तो रोज दारू पिऊन घरी यायचा, त्यानंतर तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करायचा. सासरकडील अन्य नातेवाईकही सातत्याने घरी येऊन त्रास देत असे. ईश्वरीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यांनी दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, पतीच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती.
मृत ईश्वरीच्या वडीलांनी मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. अजयला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळ्याची साखळी, मुलीसाठी ५ तोळे सोने, २ लाख रुपये हुंडा, फ्रिज, कूलर, सोफा व सर्व घरगुती साहित्य देखील लग्नात दिलं होतं. तरीही अजय माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी करीत होता.
पती अजयसह सासरच्यांच्या छळाला कंटाळून ईश्वरीने यापूर्वी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी एकत्रित बसून चर्चा करून वाद मिटवून तिला पुन्हा सासरी पाठवले. ६ एप्रिलला रात्री ११ वाजता जेवणात केस निघाल्याच्या कारणावरून अजयने तिला मारहाण केली. ईश्वरीने रात्रभर होत असलेला त्रास सहन केला. ७ एप्रिलला त्याने पुन्हा मारहाण करीत गंभीर आरोप केले. त्याचा सततचा त्रास असह्य झाल्याने अखेर ईश्वरीने मंगळवारी गळ्याला दोर लावत जीवन संपवलं.
ईश्वरीचा पती अजय बनकर (३०, रा. श्रावस्ती कॉलनी) याच्यासह दिनेश दिलीप बनकर (३५), दिलीप दशरथ बनकर, चंद्रमणी दशरथ बनकर, छाया चंद्रमणी बनकर, आशिष चंद्रमणी बनकर, गणेश दिलीप बनकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. अजय हा मनपाच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
