ब्रेकिंग! कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस उलटली 

कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुरबाड जवळील टोकावडे मानिवली येथे प्रवाशांनी भरलेली बस उलटली. या बसमध्ये लहान मुलांसह एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात सर्व 18 प्रवासी बालबाल बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास विठ्ठलवाडी-ताहाराबादच्या दिशेने जात होती. टोकावडे मानिवली गावाजवळ आली असता, बसचा वेग जास्त असल्याने चलकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ही बस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस पलटी होताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि आरडाओरडा सुरू झाला.

10 महिन्यांचे बाळही सुखरूप बचावले

या बसमध्ये दोन लहान मुले आणि एका १० महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे एका बाजूला उलटली होती, मात्र निसर्गाची कृपा सर्वच्या सर्व १८ प्रवासी सुखरूप बाहेर आले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच टोकावडे पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बसबाहेर काढले आणि वाहतूक कोंडी दूर केली. हा अपघात नेमका बसचा वेग जास्त असल्यामुळे की तांत्रिक बिघाडामुळे झाला, याचा सविस्तर तपास टोकावडे पोलीस करत आहेत. महामार्गावरील वाढत्या वेगामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment