महाराष्ट्रात झालेल्या राष्ट्रवादीतील बंडानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण नऊ आमदारांनी रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्या पाठीशी असणाऱ्यांमध्ये शरद पवारांचे निष्टावान प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली.
या बैठकीत फेरबदलांविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असणारे प्रफुल्ल पटेल या बंडात सहभागी झाले असून सूत्रांच्या माहतीनुसार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार आहे.
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेवटच्या फेरबदलात रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांना वगळण्यात आले आहे होते. आता अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि पुरुषोत्तम रुपाला यांना बढती देण्यात येण्याची शक्यता आहे.
