Nashik : भारताची कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे. मात्र, असे असतांनाही शेतमालाला न मिळणारा भाव, नापीकी आणि सातत्याने होणारे नुकसान पाहता बेभरवशाची शेती परवडत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील फुले माळवाडी ग्रामस्थांनी आपले गाव विक्रीला काढले आहे.
हे गाव विकत घेण्याची ऑफर ग्रामस्थांनी थेट राज्य सरकारला दिली आहे. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव केला आहे. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
माळवाडी ग्रामस्थांनी या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात तब्बल ५३४ हेक्टरवर शेती आहे. यात प्रामुख्याने तरकारी माल, ऊस, कडधान्य आणि कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाचे भाव कोसळले आहे. गावात सर्वाधिक कांदा उत्पादक आहेत. मात्र, शेती परवड नसल्याने आरोग्य, शिक्षण, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही गावत नसल्याने येथील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
कर्ज चुकवता येत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विकायला काढले आहे. या संदर्भातील ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. या ठरावात आमच्या मागण्या व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे. या बाबत सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी माळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
