अजितदादांना पत्र लिहून फडणवीसांचा राष्ट्रवादीला मोठा दणका

दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग करून जमीन हडपणाऱ्या देशद्रोहाचे आरोप असणाऱ्या नवाब मलिकांना महायुतीत सामील करवून घेता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणका दिला आहे.

वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी आज नागपूर मध्ये येऊन विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतला. ते सत्ताधारी बाकांवर मागच्या रांगेत बसले. या मुद्द्यावरून शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे – फडणवीस सरकारला विधान परिषदेत घेरले.

आम्हाला देशद्रोह्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसता असे म्हणत होतात. आता तेच आमदार विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी सत्ताधारी बाजूने बसलेत, मग सरकारची भूमिका काय??, असा बोचरा सवाल दानवेंनी केला होता.

त्यावेळी फडणवीस यांनी दानवेंना परखड उत्तर दिले. देशद्रोहाच्या आरोपाखाली नवाब मलिक तुरुंगात असताना ज्या पक्षाचे मुख्यमंत्री त्यांना मंत्रिमंडळातून देखील काढू शकले नाहीत त्यांनी महायुती सरकारला त्यांच्याबाबत प्रश्न विचारू नयेत, असा टोला फडणवीस यांनी हाणला.

पण त्यानंतर मात्र या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून दबाब मलिक यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे आरोप आहेत. त्यांना महायुतीत सामील करून घेता येणार नाही, अशा परखड शब्दांमध्ये सुनावले. नवाब मलिक विधानसभा सदस्य आहेत.

त्यांना कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्याशी वैयक्तिक कोणतेही शत्रुत्व अथवा आकस नाही. पण त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे जे आरोप आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांना महायुतीत सामील करून घेणे योग्य ठरणार नाही, असे भाजपचे मत आहे, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार आपला आहे, पण देशद्रोहाचा आरोप असणाऱ्यांना महायुतीचा भाग करणे आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही, तर तुम्ही त्यांचे स्वागत जरूर करू शकता. कारण सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना महायुतीचा भाग बनवून बाधा पोहोचणार नाही, याचा विचार प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागतो. त्यामुळे आमचा नवाब मलिक यांच्या समावेशाला विरोध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

त्याच वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिकांच्या मंत्रिपदाला भाजपने विरोध केल्याची आठवणही या पत्रात करून दिली. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर थेट अजितदादांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत भाजपच “खरा दादा” असल्याचे सिद्ध केले.

Leave a Comment