विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणामुळे कुटुंबाला समस्यांचा सामना करावा लागतो. वैवाहिक जीवन संपुष्टात येतं. कुटुंबात कलह वाढतात आणि यातून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असते.
उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाला गेल्या दोन वर्षांपासून अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन प्रतिष्ठित घरांतल्या व्यक्तींचा विवाह झाला; पण पत्नीने पतीला पहिल्याच रात्री सांगितलं, की तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे दोघांच्या कुटुंबात वाद सुरू झाले. यामुळे पतीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तसंच प्रकरण पोलीस आणि न्यायालयापर्यंत पोहोचलं.
उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. कानपूरमधल्या एका कपलचा विवाह गोव्यातल्या आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडला. वऱ्हाडी मंडळींना विमानाने गोव्यात आणलं गेलं. वधू-वरांनी सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने पतीकडे एक धक्कादायक खुलासा केला.
‘माझं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे. कुटुंबाच्या दबावामुळे मी हे लग्न केलं,’ असं तिने पतीला सांगितलं. तसंच पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास तिने नकार दिला. यामुळे पतीला जबर धक्का बसला.
दरम्यान, पत्नीने पतीसह सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ, मारहाण केल्याचा आरोप करून पोलिसांत तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही कुटुंबं हायप्रोफाइल असून त्यांच्यात दोन वर्षांपासून वाद सुरू आहेत.
कानपूरमधल्या दोन मोठ्या व्यापारी कुटुंबांमधल्या कपलचा शाही विवाह सोहळा पार पडला. आयुष खेमकाचा विवाह शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलीशी 26 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. दोन्ही कुटुंबं संपन्न असून, एकमेकांचे शेजारी आहेत. वऱ्हाडी मंडळींना विमानानं गोव्याला नेण्यात आलं. व्हीआयपी रिसॉर्टमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहाची चर्चा कानपूरपासून ते गोव्यापर्यंत होती.
आयुष खेमकाच्या म्हणण्यानुसार, ‘पत्नीने मला सांगितलं की ती कोणा दुसऱ्यावर प्रेम करते. मी लग्न दबावामुळे केलं.’ त्यानंतर पत्नीचा प्रियकर तिच्या सासरी येत असे. प्रियकराच्या जाण्यायेण्याचं सीसीटीव्ही फुटेज आयुषच्या हाती लागलं. त्यानंतर या पती-पत्नीत वाद सुरू झाले. कुटुंबात कलह सुरू झाला. रोज दोघांमध्ये भांडणं होऊ लागली.
आयुषने बदनामीच्या भीतीने ही गोष्ट लपवून ठेवली. पत्नीने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास आणि पत्नी म्हणून सोबत राहण्यास नकार दिला. आयुषने याला विरोध केला असता तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली. पत्नीने तिचे मामा आणि अन्य कुटुंबीयांना बोलावलं. त्यांनी मारहाण करून घरातले दागिने चोरले, असा आरोप आयुषनं केला. आयुषच्या पत्नीचे मामा शहरातले प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांची पोलीस विभागात चांगली ओळख आहे.
आयुषने याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता; पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तपासकर्त्याने सीसीटीव्हीसह सर्व पुरावे गायब केल्याचा आरोप आहे. बनावट तपशील देऊन अंतिम अहवाल सादर करून प्रकरण बंद करण्यात आलं. यानंतर आयुषने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने फेरविचार करण्याचे आदेश दिले. डीसीपी सेंट्रल प्रमोद कुमार यांनी एसीपी अन्वरगंज यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
