केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात शनिवारी (ता. २३) दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली आहे. मात्र, यातील ५ जागांवरील उमेदवार बदलावे लागतील, अशी अटही घालण्यात आली आहे.
त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय. दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला, तरी देखील महाराष्ट्रातील ४८ जागेवरील महायुतीचे उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपने मात्र, २० जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची माहिती आहे.
अशातच जागावाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
