महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी धबधबे आणि नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी अधिक प्रमाणावर पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल होतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत कोकणातील रायगड जिल्ह्यात आणि पश्चिम घाटाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

तसेच नाशिक, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rain) जोर वाढण्याचा अंदाज आहे. सध्या यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच धुळे, नंदूरबार, जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांतही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवविला आहे. तर अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे.

Leave a Comment